ठाणे महापालिका क्षेत्रातील ४७ अनधिकृत (बोगस) शाळांवर कायदेशीर कारवाईसाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. यापैकी आठ शाळा बंद झाल्या असुन शिक्षण विभागाने ४३ शाळां विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केले आहेत, तर ३३ अनधिकृत शाळांची यु डायस रद्द करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळात तसेच वारंवार केलेल्या पाठपुराव्याने अनधिकृत शाळांमुळे हजारो विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले आहे. ठाणे महापालिकेने आपल्या शाळा सक्षम करून ठोस उपाययोजना करण्याची सूचनाही आ. संजय केळकर यांनी केली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमाच्या ४२, मराठी माध्यमाच्या २ आणि हिंदी माध्यमाच्या ३ अशा एकुण ४७ बोगस शाळांची यादी जाहिर करून अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन केले होते. ठाणे मनपा क्षेत्रातील राबोडी, मानपाडा, डायघर गाव, सुभाषनगर आणि ढोकाळी येथे प्रत्येकी एक तर दिवा भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा आहेत. सरकारची कोणतीही मान्यता न घेता अनधिकृतपणे या शाळा चालविण्यात येत असल्याचा मुद्दा संजय केळकर यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडुन विद्यार्थ्याच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर महापालिकेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी, शिक्षण विभागाने अनधिकृत शाळावर केलेल्या कारवाईचा तपशील पेश केला आहे. ४७ पैकी ८ शाळा बंद झाल्या असुन दोन शाळांना शासनाकडून परवानगी मिळाली आहे. तर उर्वरीत शाळा बंद करण्याबाबत वारंवार नोटीसा बजावण्यासह दंडाच्या नोटीसाही बजावल्या होत्या. ३३ अनधिकृत शाळांची यु डायस रद्द करण्याची कार्यवाही सुरु केल्याचे राक्षे यांनी केळकर यांना उत्तरादाखल सादर केलेल्या तपशीलात नमुद केले आहे.