सुरक्षित प्रवासासाठी प्राथमिक शाळेपासून जनजागृतीला सुरूवात केल्यास पुढे अच्छे दिन येऊन भविष्यात सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची वेळ येणार नाही असं प्रतिपादन भिवंडीचे खासदार आणि केंद्र शासनाच्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी केलं. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आजच्या डिजीटल युगात जीवन गतिमान झालं आहे. पण ही गतिमानता रस्त्यावर दिसता कामा नये, चळवळ उभारून सुरक्षित रस्ता प्रवासासाठी प्रबोधन होण्याची गरज कपिल पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातील प्रमुख महामार्ग जिल्ह्यातून जाणारे आहेत. त्यामुळं भविष्यातील वाढणा-या वाहतुकीचा विचार करून आत्ताच नियोजन करायला पाहिजे असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. वाहन चालकांच्या दृष्टी क्षमतेचं परिक्षण होणं महत्वाचं असून त्यासाठी आवश्यक सहकार्य जिल्हा रूग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिलं. ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारची माहिती देणा-या रस्ता सुरक्षा चित्ररथाचं उद्घाटन यावेळी झालं.