ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकशाही, निवडणूक आणि सुशासन या विषयावर जनजागृती व्हावी यासाठी २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येणार असून १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीचा भाग बनावे असं आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं लोकशाही पंधरवड्याअंतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. या लोकशाही पंधरवड्यानिमित्तानं शहरात विविध ठिकाणी जाहिरात, पथनाट्याचं आयोजन करून लोकशाहीचं महत्व सांगण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रामधील शैक्षणिक संस्थांमध्ये महाविद्यालयात प्रथम वर्गामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून १८ वर्ष पूर्ण झाल्याबरोबर मतदार यादीत नाव नोंदवण्याचं प्रमाणपत्र घेतलं जाणार आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या तरूण मतदारांनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवून लोकशाही मजबूत करावी असं आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे.