हिरानंदानी परिसरात तयार असलेल्या इमारतीतील गाळे फेरीवाल्यांना द्यावे अशी मागणी स्वराज इंडिया या संस्थेनं केली आहे. हिरानंदानी परिसरातील फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांच्या त्रासाबद्दल नागरिक आवाज उठवत आहेत. हे नागरिक या फेरीवाल्यांचे ग्राहकही आहेत. पदपथ मोकळे व्हावेत याबाबत दुमत नाही पण याच परिसरात फेरीवाल्यांसाठी तयार असलेल्या मार्केटचे गाळे जे बांधून तयार आहेत ते फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांना द्यावेत अशी फेरीवाल्यांचीही मागणी आहे. तसंच गाळे दिल्यावर रस्त्यावर कोणालाही व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी स्वराज इंडियानं केली आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करून फेरीवाल्यांचे व्यवसाय स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार तसंच नागरिकांचा पदपथावरून चालण्याचा हक्क आयुक्त अबाधित ठेवणार का असा प्रश्न स्वराज इंडियानं उपस्थित केला आहे.