आत्मनिर्भर भारत’अंतर्गत ठाण्यात दाखल झालेली ‘हिंद अयान’ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज मुंबईकडे रवाना झाली. यावेळी उपायुक्त मिनल पालांडे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देवून स्पर्धेस झेंडा दाखविला. सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच, भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद अयान, या बहुस्तरीय सायकलिंग शर्यत पाच फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झाली. दिल्ली-आग्रा-जयपूर-भिलवाडा-उदयपूर-गांधीनगरमार्गे ती १६ फेब्रुवारीला ठाण्यात पोहचली. आज सकाळी ७.०० वा. ही शर्यत ठाण्याहून मुंबईला रवाना झाली. या प्रवासात ठाणे, मुंबईतील सायकलपटू ठाणे महापालिका ते मुंबई महापालिका या जॉय राइडमध्ये सहभागी झाले होते. ‘हिंद अयान’ हे ५० सायकलपटूंचे पथक आहे. ठाण्यात दाखल झालेल्या या सायकलपटूंनी ठाणे शहरातील शाळा आणि हेरिटेज वास्तूंना भेटी दिल्या. ठाणे ते मुंबई असा प्रवास करून १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पुण्यात या शर्यतीची सांगता होणार आहे.