हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या दीड तासात त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात भिवंडी शांतीनगर पोलीसांना यश आलं आहे. मोहम्मद खान आणि लवकुश गौतम यांच्या ३ वर्षाच्या दोन मुली भिवंडीतील गायत्रीनगर येथून हरवल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या दोन मुली गायत्रीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ खेळत असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हरवल्या होत्या. याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तातडीने शोध घेत अवघ्या दीड तासात मुलींना शोधून काढले. या दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असता काही आक्षेपार्ह आढळून न आल्याने त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या.