ठाण्यात आज ठिकठिकाणी सामुहिक राष्ट्रगीत झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता जिथे असाल तिथे उभं राहून राष्ट्रगीत गाण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार देशप्रेमी नागरिकांनी राष्ट्रगीताचं गायन केलं. रस्त्यारस्त्यावर, शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये अशा ठिकठिकाणी हे राष्ट्रगीत गाण्यात आलं.
जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात झाले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
ठाण्यात सर्वत्र ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समुह राष्ट्रगीत गायन’ झाले. शासनाने दिलेल्या मार्गदर्शकसुचनेनुसार सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे, उप आयुक्त वर्षा दीक्षित यांच्यासह महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.