ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आढावा घेवून या स्पर्धेत देशात पहिल्या १० शहरात येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ सुरू असून महापालिका आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्तांनी गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत विभागनिहाय मिळालेल्या गुणांचा आढावा घेतला. यामध्ये कोणत्या विभागास गुण वाढविण्याची आवश्यकता आहे तसेच यावर्षी उत्तमरित्या काम करून स्पर्धेत अव्वल येण्यासाठी अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. शहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था, पाणी पुरवठा, साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था तसेच परिसर स्वच्छता आदी गोष्टी अद्ययावत ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. केंद्र शासनाने नवीन स्वच्छ सर्वेक्षण प्रणालीनुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरीता विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या.