ठाणे शहरातील अनेक स्मशानभूमी जुन्या झाल्या आहेत. त्याच्या आजूबाजूला नागरी वस्ती वाढत असल्याने स्मशानभूमी स्थलांतरित कराव्यात, त्यातील धुराचा त्रास थांबवा अशा नागरिकांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे येत आहेत शिवाय नवीन स्मशानभूमींसाठी जागा मिळत नाही. सध्याच्या स्मशानभूमीत अनेक गैरसोयी असून अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळण्याकरिता जुन्या झालेल्या सर्व स्मशानभूमींचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसविल्या जाव्यात आणि संपूर्णपणे स्माशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींच्या विकासासाठी राज्य सरकारकडे ५० कोटी निधीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून त्यासाठी तितक्या निधीची तरतूद राज्य सरकारने केली आहे. यात चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केल्याने आता स्मशानभूमींच्या विकासकामाला पुढील काही महिन्यात लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहरातील रामबाग, येऊर गाव, बालकुम, मोघरपाडा, वाघबीळ गाव, माजिवडा गाव या पाच ठिकाणच्या स्मशानभूमींचे टप्प्या टप्प्याने आधुनिकीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार असून तेथे गॅस दाहिन्या बसवल्या जाणार आहेत.