समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शास्त्रीय संगीतात असून यात प्रभा अत्रे यांचं योगदान मोलाचं आहे. देशाच्या सीमा ओलांडून गाण्यासोबत भारतीय संस्कृती, परंपरा त्यांनी पोहचवली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. सुप्रसिध्द गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा पंडीत हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. गुरूकुल प्रतिष्ठानतर्फे १४व्या बासरी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकार कलाप्रेमींच्या पाठीशी उभे राहिल. शास्त्रीय संगीतासाठी काही उपक्रम, योजना असल्यास त्या मांडा त्यांचा सन्मान केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना प्रमुखांची आठवण सांगितली. वयाने ज्येष्ठ असलो तरी मनानी तरूण राहिलं पाहिजे असं शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे असं सांगितलं. ठाणेकर हा ठाणेकर आहे तो कधीच बदलत नाही त्यामुळे ठाण्यात येण्याचा आनंद आगळावेगळा असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. श्रोत्यांची दाद आणि प्रेम सर्वात मोठे असते. हरीजी आणि आपले संबंध जुने आहेत. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार घेताना मनस्वी आनंद होत असून हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळत असल्याने आपला आनंद द्विगुणित झाल्याचं प्रभा अत्रे यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितलं.