राज्य सरकारने हाती घेतलेल्या जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील ० ते १८ वयोगटातील मुले मुली तसेच शाळाबाह्य मुलांची काटेकोरपणे तपासणी होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. राज्यभरात जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिम सुरू करण्यात आली आहे. ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या आणि आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्याचे केले आहे. या मोहिमेत ठाणे महापालिकेतर्फे सुमारे दीड लाख मुलांची तपासणी करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शून्य ते १८ या वयोगटातील सगळ्यांची आरोग्य तपासणी, आवश्यक तेथे उपचार आणि शस्त्रक्रिया यांचे नियोजन, उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा यात कोणतीही त्रुटी किंवा दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी कृती दलाच्या बैठकीत दिले. शाळा आणि कनिष्ठ महविद्यालयातील मुलांसोबत, सिग्नल शाळा, रेल्वे स्थानक परिसरातील मुले, बांधकामाच्या साईटवरील मुले, नाका कामगारांची मुले यांची तपासणी करावी असे आदेश आयुक्तांनी दिले. सुरक्षित आणि सुदृढ आरोग्यासाठी तज्ज्ञांमार्फत संबंधितांना समुपदेशनाची सुविधा दिली जाणार आहे. शून्य ते 18 वयोगटातील बालके, किशोरवयीन मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन यामध्ये आजारी बालके आढळल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार केले जाणर आहेत असं आयुक्तांनी सांगीतलं.