सी पी तलाव येथील कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबली पाहिजे – अभिजीत बांगर

वागळे इस्टेट मधील सी पी तलाव येथील घनकचरा स्थलांतर केंद्रातून आसपासच्या परिसरात जाणवणारी कचऱ्याची दुर्गंधी तत्काळ थांबली पाहिजे, असा सक्त इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घनकचरा विभाग आणि कंत्राटदार यांना दिला आहे. वागळे इस्टेट येथील घनकचरा स्थलांतरण प्रकल्पाला आयुक्त बांगर यांनी भेट दिली. या प्रकल्पात ठाणे शहर आणि कळवा येथील कचरा एकत्र होतो. येथून तो प्राथमिक प्रकिया करून क्षेपणभूमीवर पाठविला जातो. दररोज छोट्या आणि मोठ्या घंटा गाड्यांच्या सुमारे ३०० फेऱ्या येथे कचरा आणतात. दररोज सुमारे ६०० टन कचऱ्याच्या हाताळणीचे हे चक्र २४ तास सुरू असते.
गेले काही दिवस कचरा स्थलांतरित करण्यास अडचण आल्याने सी पी तलाव येथेच कचरा साठला होता. त्याचे आता स्थलांतरण करण्यात आले असले तरी या भागात कमालीची दुर्गंधी जाणवत होती. त्याबद्दल नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी वारंवार तक्रार करतात. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे ही दुर्गंधी परिसरात पसरते. कचऱ्याच्या गाड्या येण्याच्या वेळेचे नेमके नियोजन करून दररोज चार ते सहा तासांचा एक टप्पा केवळ या प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी मोकळा ठेवावा. या काळात उपलब्ध असलेल्या सर्व चांगल्या पद्धती वापरून गाड्यांचा मार्ग, कचरा साठवणूक विभाग आणि आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. हा उपाय केल्याने हळूहळू दुर्गंधी कमी होऊन या परिसराला दिलासा मिळेल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. ताजा कचरा साठवून ठेवला की दुर्गंधी सुटते. मात्र, ताज्या कचऱ्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावली तर दुर्गंधी येणार नाही. तसेच, त्यावर सतत फवारणी केली तरी दुर्गंधीचे प्रमाण कमी होईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. सीपी तलाव येथील कचरा हाताळणी व्यवस्थेत कालबद्ध आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे कंत्राटदाराने मान्य केलेले आहे. त्यामुळे तसा बदल घडून यायला पाहिजे. त्याचे दैनंदिन निरिक्षण करण्यात यावे. त्रुटी आढळली की लगेच त्याबद्दल नोटीस काढली जावी. तरीही परिस्थितीत दृश्य स्वरुपातील फरक पडला नाही. तर कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रकल्पात प्रवेश करताना एन ९५ मास्क दिला जावा. तो दररोज नवीन असावा. हातात ग्लोव्हज, पायात गम बूट हवेतच. कर्मचाऱ्यांना काम करताना सोयीचे होईल अशी ही सुरक्षा साधने हवीत, असे आयुक्त बांगर यांनी बजावले. या कचऱ्याच्या सानिध्यात कोणीही कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय सलग आठ तास राहिले तर त्याच्या आरोग्यावर परिमाण होईलच. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे आयुक्त बांगर म्हणाले. कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय कर्मचारी काम करताना दिसला तर कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणावर दंड करण्यात येईल. शहर स्वच्छता जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले रहाणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी महापालिका आणि सर्व यंत्रणा यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading