सिग्नल शाळेचा प्रयोग केवळ एका महापालिकेपुरता किंवा शहरापुरता न राहता या प्रयोगाचा शासकीय धोरणात अंतर्भाव करण्याची गरज रामन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केली. सिग्नल शाळेच्या प्रकल्पाला भेट देऊन त्यांनी हा प्रकल्प समजावून घेतला. आज जगभरात लोक रस्त्यावर भटकत आहेत. अशा परिस्थितीत श्रध्दा फौंडेशन हे रस्त्यावरील मनोरूग्णांसाठी आधार बनण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आज रस्त्यावर केवळ मनोरूग्णच नाही तर असंख्य विस्थापित आणि स्थलांतरीत आहेत. अशा लोकांबरोबर त्यांची निष्पाप बालकंही नरक यातना भोगत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे नशीब बदलण्याचं काम करण्याची गरज आहे. या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना शिक्षण देण्यासाठीचा शैक्षणिक प्रयोग म्हणून सिग्नल शाळा पथदर्शी असून शासनानं या प्रयोगाला आपल्या धोरणाचा भाग बनवावा अशी अपेक्षा वाटवानी यांनी व्यक्त केली. स्थलांतरीत आपली संस्कृती घेऊन फिरत असतात. शहरात ते उदरनिर्वाहासाठी वास्तव्य करत असले तरी संस्कृतीत ते रमतीलच असं नाही. शासनानं आता त्यांच्यासाठी नैसर्गिक पर्याय उभे केले पाहिजेत ज्यातून उदरनिर्वाहासोबत त्यांची पुढील पिढी स्थिरावेल आणि त्यासाठी शिक्षण हाच मोठा पर्याय असल्याचं सांगून राज्यभर नव्हे तर देशभर सिग्नल शाळेसारख्या शाळा उभ्या रहायला हव्यात अशी गरज डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केली.