ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे. देशातील ३५ राज्यातील एक हजार प्रयोगांच्या मधून निवडण्यात आलेल्या २०० प्रकल्पांमध्ये सिग्नल शाळेच्या प्रकल्पाची निवड झाली आहे. उपराष्ट्रपती भवनात १२ फेब्रुवारी रोजी देशभरातील अंत्योदय पुरस्कार प्राप्त उपक्रमांवर आधारीत पुस्तकात सिग्नल शाळेचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे. ठाण्यातील विविध सिग्नलवर व्यवसाय करणारी अथवा भिक्षेकरी मुलं शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावी म्हणून ३ वर्षापूर्वी तीन हात नाका पूलाखाली सिग्नल शाळेची स्थापना झाली. या शाळेमुळं ४२ मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. गेल्या ३ वर्षात सिग्नल शाळेच्या प्रयोगाला विविध माध्यमांतून उचलून धरण्यात आलं आहे.