कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मिय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामुहिक छटपुजेला परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्वधर्मिय सण-उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने आणि लोकांनी एकत्रित न येता साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षीचा छटपूजा सणही अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेनं केले आहे. उपवन तलाव, कोलशेत विसर्जन महाघाट, रायलादेवी तलाव, दत्तघाट(मासुंदा तलाव), कोपरी खाडी, पारसिक विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर, तुर्फेपाडा या ठिकाणी छटपुजेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली असून उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडू नये, नागरिकांनी गर्दी करू नये तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. सर्व भाविकांनी छटपुजा उत्सव गर्दी न करता साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.