सातव्या आर्थिक गणनेसाठी जिल्ह्यातील आस्थापनांच्या माहितीचं संकलन सुरु आहे. यासाठी प्रगणक नियुक्त केले आहेत. या प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या अनुषंगानं येणा-या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी आढावा बैठक घेतली. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सातव्या आर्थिक गणनेचं काम जिल्ह्यात सुरु आहे. ही गणना मोबाईल ॲपद्वारे घेतली जात आहे. यासाठी जिल्ह्यात तीन हजार प्रगणक आणि ९८३ पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. आर्थिक गणना म्हणजे देशाच्या भौगोलिक सिमातंर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची संपूर्ण मोजणी करणे. या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय आणि सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटुंबास, उद्योगास भेट देऊन करण्यात येणार आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर नियोजनासाठी केला जातो. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या सहभागाची आकडेवारी प्राप्त करण्याच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या पश्चात सर्वेक्षणाची आखणी तयार करण्यासाठीही केला जातो. जिल्ह्याचा मोठया प्रमाणावर विकास झाला आहे. तसेच आस्थांपनामध्येही चांगली वाढ झाली आहे. कुठलीही आस्थापना वगळली जाणार नाही याची दक्षता घ्या तसेच प्रगणकांनी केलेल्या गणतेची पडताळणी करा अशा सुचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या.