सांडपाण्यावर भाज्यांची लागवड करणा-यांवर वर्तकनगर प्रभाग समितीतर्फे कारवाई करण्यात आली. सांडपाणी वापरून भाज्यांची लागवड ज्या ज्या ठिकाणी होत आहे त्याची चौकशी करून कारवाई करावी असे आदेश महापौरांनी अलिकडेच दिले होते. रेल्वे मार्गाजवळच्या मोकळ्या जागेत तसंच शहराच्या विविध ठिकाणी भाजीचे मळे आहेत. कोणी बोअरवेल असल्याचं दाखवून प्रत्यक्षात मात्र मलमूत्र मिश्रीत सांडपाणी तसंच गटाराच्या पाण्यावर हा भाजीपाला पिकवत आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा तसंच समतानगर, गांधीनगर, सिडको, मफतलाल कंपाऊंड परिसरात अशा पध्दतीनं पिकवलेली भाजी ठाण्यातील विविध विभागात विकली जाते. ही भाजी पिकवणे आणि विकण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाण्याचा वापर केला जात आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कर्करोग, पोटाचे विकार, मेंदूचे विकार अशा दुर्धर आजारांना या भाज्यांचे सेवन केल्यामुळं सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं अशा गलिच्छ ठिकाणी भाजी पिकवणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार गेला आठवडाभर अशा पध्दतीनं भाजी पिकवणा-या ठिकाणांचं अशा पध्दतीनं सर्वेक्षण करण्यात आलं आणि आज समतानगर येथील अशा पध्दतीनं भाजी पिकवणा-यांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे डिझेल पंप जप्त करण्यात आले. महापालिकेनं या दूषित पाण्याचे नमुने जप्त केले होते. त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत हे पाणी दूषित असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं समतानगर येथे अशा पध्दतीनं पिकवण्यात आलेली भाजी काढून नष्ट करण्यात आली.