सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूराचा फटका ठाणे-मुंबईकरांना बसला असून दूधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगली कोल्हापूरमध्ये पूराने थैमान घातलं आहे. या पूरामुळे कोल्हापूरमध्ये दूध संकलन झालेलं नाही. पूरामुळे रस्तेही ठप्प असून यामुळं ठाणे-मुंबईत दूधाचा तुटवडा दिसत आहे. आज अनेक घरात दूध आलं नाही. तर काही दूध विक्रेत्यांनी प्रत्येकाला दूध मिळावं यासाठी फक्त अर्धा लिटर दूध विक्री करणं पसंत केलं. गोकुळ, वारणाचा तुटवडा भासत असून अनेक ठिकाणी अमूलचं दूध दिलं जात होतं. ठाणे शहर दूध विक्रेता संघानं दूध तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये कोणीही एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेऊ नयेत असा निर्णय घेतला आहे. ठाण्यामध्ये गोकुळचं साधारणत: ३ लाख लिटर दूध रोज येतं. आज तुटवडा भासला असला तरी परिस्थिती कायम राहिल्यास गोकुळ-वारणाचं दूधच मिळणं अवघड होण्याची शक्यता आहे. यामुळं सध्या ग्राहक खाजगी डेअ-यांच्या दूधाकडे वळला आहे. पण तिथेही मागणी आणि पुरवठ्यामध्ये असमतोल निर्माण झाल्यास परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.