कोविड आजाराची चाहूल लागताच शासनाने सर्व प्रथम शाळा बंद केल्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजी पोटी कोचिंग क्लासेसही मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद केले आहेत. तेव्हापासून क्लासेस संचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. क्लासेस वर्षाच्या अंतिम टप्प्यात बंद झाल्यामुळे गेल्या वर्षात येणारी फी मिळालेली नाही शिवाय चालू वर्षात क्लासेस कधी सुरू होतील ह्याची शाश्वती नाही. शासनाने 2011 पासून शिक्षक भरती केलेली नाही. त्यात नोकऱ्या मिळत नसल्यामुळे कोचिंग सारख्या लघु उद्योगाकडे अनेकजण वळले आहेत. राज्यात 50 हजार सामान्य कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये 5 लाख शिक्षक आणि इतर कर्मचारी यांचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु या बंदमुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या तरुणांनी क्लासेससाठी भाड्याने गाळे घेतले आहेत त्यांचे भाडे थकले आहे. काही संचालकांचे घर आणि क्लासेस चा गाळा दोन्ही भाड्याचे आहे. त्याचे भाडे कसे भागवायचे तसेच घरी राशन कसे भरायचे यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही क्लासेस संचालकांनी आपले क्लासेस बंद केले आहेत.परंतु यामध्ये असलेले बेंच आणि इतर सामान कुठे ठेवायचे ही समस्या निर्माण झाली आहे. काही संचालकांनी हा उद्योग निर्माण करण्यासाठी कर्ज घेतली आहेत त्याचे हफ्ते थकले आहेत. एकंदरीत विचार करता गेल्या वर्षीचे आर्थिक नुकसान त्याचप्रमाणे चालू शैक्षणिक वर्षात क्लासेस कसे घ्यायचे. क्लासेस चालू करण्यास परवानगी मिळेल किंवा नाही या सर्व विवंचनेने क्लासेस संचालक आत्महत्येस प्रवृत्त होतील अशी भीती निर्माण झाली आहे. क्लासेस संचालक हे शाळां बरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे काम करतात. या सर्वांचा शासनाने विचार करावा त्यांना आर्थिक सहकार्य करावे. इतर व्यावसायकांप्रमाणे क्लासेस संचालकांना सशर्त क्लासेस घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.