आजच्या प्रतिकुल परिस्थितीत लोकप्रतिनिधी, नागरिक, डॅाक्टर्स, पोलिस आणि प्रशासन या सर्वांनी मिळून कोव्हीड19 चा सामना करण्याची ही वेळ असल्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले. लोकमान्यनगर सावरकर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ते बोलत होते. कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वचजण चांगले काम करीत आहेत. तथापि आता संघटितपणे लढा देण्याची ही वेळ आहे. या लढ्यामध्ये लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक, पोलिस, प्रशासन, डॅाक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत. पण आपल्याला आता एकत्रितपणे लढण्याची ही वेळ असल्याचे सांगत त्यांनी या लढ्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आर. जे. ठाकूर महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या क्वारंटाईन सेंटरची पाहणी करून त्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.