कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. राजकीय दौरे,मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणा-या सरकारकडुन केवळ मराठी जनांच्या सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडुन विरोध करीत आहे.एकतर दहीहंडीसंबंधात आज मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते.जे उपस्थित होते त्यांना तर बोलूही दिले नाही. केवळ टास्क फोर्सने आपले कोविड पालुपद सुरू ठेवल्याचा आक्षेप या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी नोंदवला आहे.याचाच अर्थ सरकारला तरुणाईच्या इच्छा आकांक्षाशी काही देणे घेणे नाही.गेली दोन वर्षे ही तरुण मंडळी दहीहंडीचा सण साजरे करू शकलेले नाहीत. गणेशोत्सवाला परवानगी आणि दहीहंडी साठी कोविडचा बाऊ हा कुठला न्याय, किमान त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार सरकारने करायला हवा.तेव्हा,कितीही बंधने घातली,गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणा-या मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी राहील असा थेट इशाराच अविनाश जाधव यांनी सरकारला दिला आहे.