समूह विकास योजनेच्या ६ आराखड्यांना उच्चाधिकार समितीनं मंजुरी दिल्यानं या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या समितीच्या बैठकीत कोपरी, राबोडी, लोकमान्यनगर, किसननगर आणि टेकडी बंगला या ६ योजनांचे सादरीकरण करण्यात आले. शहरासाठी समूह विकास योजनेचे एकूण ४४ आराखडे तयार करण्यात आले असून १४८९ हेक्टर क्षेत्र त्या योजनेत विकसित होणार आहे. कोपरी, राबोडी, टेकडी बंगला, हजुरी, किसननगर आणि लोकमान्यनगर या एकूण ६ आराखड्यांच्या माध्यमातून ३१६ हेक्टर क्षेत्र विकसित होणार आहे. या बैठकीमध्ये शासकीय जमिनीवरील घरं मालकी हक्कानं देण्याबाबत राज्य शासनाला शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत अस्तित्वातील जमिनीचा वापर, अस्तित्वातील सुविधा आणि पुनरूथ्थान आराखड्यांमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीत प्रस्तावित करण्यात आलेल्या सुविधा यावर विस्तृत चर्चा करून मंजूर विकास योजनेमध्ये जे ना-विकास क्षेत्र किंवा आरक्षित क्षेत्र आहे ते मोकळे ठेवण्याबाबत काळजी घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या.