ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेअंतर्गत ६ शहर पुनर्विकास आराखड्यांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. किसननगर, कोपरी, राबोडी, हजुरी, टेकडी बंगला आणि लोकमान्यनगर या ६ आराखड्यांना राज्य शासनानं काल मंजुरी दिली आहे. किसननगर समूह विकास योजनेतील किसननगर, जयभवानी नगर येथील पहिल्या योजनेचं भूमीपूजन उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील विविध लोकप्रतिनिधींनी समूह विकास योजना लागू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आंदोलनं, मोर्चे, विधीमंडळात उपस्थित केलेले प्रश्न अशा विविध माध्यमांतून सरकारवर दबाव निर्माण करण्यात आला होता. या विविध प्रयत्नांमुळे समूह विकास योजनेला मंजुरी मिळाली. त्यानंतर सोशल इम्पॅक्ट ॲसेसमेंट अहवाल सादर करण्यात आल्यामुळं न्यायालयानंही त्याला मंजुरी दिली. ठाणे महापालिकेनं समूह विकास योजनेतील ४४ आराखड्यांपैकी ६ आराखडे राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. राज्य शासनानं काल त्याला मंजुरी दिली आहे. या ६ आराखड्यामध्ये १ लाख ७ हजार बांधकामं असून ४ लाख ८५ हजार लाभार्थी आहेत.