समूह विकास योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे यांना न वगळल्यामुळं भूमीपुत्र आणि ठाणेकर नाराज आहेत. ही नाराजी वाढू नये म्हणून समूह विकास योजनेचं उद्घाटन करू नये अशी मागणी ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. समूह विकास योजनेचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. समूह विकास योजनेतून विस्तारीत गावठाण, कोळीवाडे यांना वगळण्याचं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र अद्याप याबाबत शासन निर्णय झालेला नाही. त्यामुळं कोळीवाडा, गावठाण मधील स्थानिक रहिवासी आणि त्यात पिढ्यानपिढ्या राहत असलेला आगरी समाज नाराज आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आजतागायत कोळीवाडे, गावठाण आणि विस्तारीत गावठाणांचं सीमांकन झालेलं नाही. हे नगरविकास मंत्र्यांना माहित असतानाही ते काही गोष्टी लपवत आहेत. अशा परिस्थितीत उद्घाटन चुकीचं ठरणार असून या उद्घाटनास स्पष्ट नकार द्यावा अशी समितीनं मागणी केली आहे. विस्तारीत गावठाण, कोळीवाडे यांना या योजनेतून वगळण्यात आल्याचा निर्णय झाल्यास हा लेखी आदेश घेऊन ठाण्यात यावे, सर्व भूमिपुत्र आणि ठाणेकर आपल्या स्वागतासाठी ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशी येतील अशी अपेक्षाही समितीनं व्यक्त केली आहे.