एकीकडे मराठा समाजानं ब्राह्मण उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असतानाच आता समस्त ब्राह्मण समाजानं मराठा असलेल्या राजन विचारे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज एका पत्रकार परिषदेत समस्त ब्राह्मण समाजाचे राज्य समन्वयक विश्वजीत देशपांडे यांनी हा पाठिंबा जाहीर केला. समस्त ब्राह्मण समाज ही सर्व ब्राह्मणांची शिखर संस्था आहे. समस्त ब्राह्मण समाजानं जिल्ह्यातील कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे, भिवंडी लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल पाटील यांनाही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत सरकार या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून द्यायचं असल्यामुळे जातपात न पाहता महायुतीच्या या तिन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचं विश्वजीत देशपांडे यांनी सांगितलं. समस्त ब्राह्मण समाजाचे ९ हजार सदस्य आहेत. ठाण्यामध्ये ब्राह्मण समाजाची सुमारे साडेतीन लाख मतं असल्याचं यावेळी सांगितले. उमेदवाराला पाठिंबा देताना उमेदवार हा सुशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कृत असल्याचं पाहून पाठिंबा दिल्याचं अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष विलास जोशी यांनी सांगितलं. उमेदवाराचा सुशिक्षितपणा पाहण्याऐवजी उमेदवार सुंसस्कृत असणं आवश्यक असल्यामुळेच हा पाठिंबा जाहीर केल्याचं विलास जोशी यांनी सांगितलं. काल ब्राह्मण समाजातील दुस-या एका संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर समस्त ब्राह्मण समाजानं राजन विचारेंसह युतीच्या इतर २ उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे एकप्रकारे ब्राह्मण समाजात फूट पडल्याचंच दिसत आहे. मात्र अशी कोणतीही फूट नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.