सेंट व्हॅलेंटाईन डे हा दिवस जगभर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हे प्रेम आपल्या जवळच्या व्यक्तींवरचे असते तसेच ते आपल्या देशावरचेही असावे या विचारातून समता विचार प्रसारक संस्थेने १४ फेब्रुवारी हा दिवस देशप्रेम व्यक्त करून साजरा केला. चार वर्षांपूर्वी याच दिवशी काश्मीर येथील पुलवामा येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला होऊन त्यात ४३ जवान शहीद झाले होते. त्या दिवसाची आठवण म्हणूनही काल ठाण्यातील तलावपाळी येथे या शहीदांना श्रद्धांजली देत देशप्रेम व्यक्त करत हा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणेकर नागरिकांनीही या वेळी शहीदांना फुले वाहून त्यांच्याप्रति आपले प्रेम व्यक्त केले, या वेळी बोलताना संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबद्दल एकलव्य कार्यकर्त्यांचे कौतुक करत म्हटले की देशासाठी बलिदान देणार्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांची आठवण काढणे हे महत्वाचे आहेच. पण आजच्या व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने देशाप्रति प्रेम व्यक्त करण्याचा असा जाहीर कार्यक्रम करणे हे अतिशय स्तुत्य आहे. पण देशप्रेम दर्शवणे म्हणजे सीमेवर जाऊन शत्रूशी लढणे हे च फक्त नसून देशातील सर्व जाती धर्माच्या, विविध प्रांतात राहणार्या, विविध भाषा बोलणार्या, विविध संस्कृती जपणार्या, श्रीमंत, गरीब अशा सर्व लोकांवर मनापासून बंधु भावना जपत प्रेम करणे हे ही देशप्रेमच आहे. ७ वर्षाच्या सुश्रुत जोशी या मुलाने संविधानाची उद्देशिका सादर केली.