ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षावाल्यांना शिस्त लागावी आणि प्रवाशांना विशेषत: महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी संयुक्तरित्या जबाबदारी घेवून या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ गर्दीच्यावेळी कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी नेमावेत असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलीसांना दिले आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसर हा कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहेच, परंतु या परिसरातील रिक्षावाल्यांच्या मुजोरीला आळा घालण्याची जबाबदारी ही पोलीसांची असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत नमूद केले. कोणताही रिक्षाचालक रांगेशिवाय उभा राहणार नाही, आणि प्रवाशांना वेठीस धरणार नाही यासाठी या परिसरात सकाळी 8 ते 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत पोलीस कर्मचारी तैनात असतील या दृष्टीने नियोजन करुन त्याची नियमित अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात असेल तर नागरिकांनाही सुरक्षित वातावरण निर्माण होते, यासाठी दोन शिफट्मध्ये पोलीसांना ड्यूट्या लावाव्यात असेही त्यांनी नमूद केले. वागळे मेन रोड, रोड नंबर 22 आणि नितिन कंपनीकडे येणारा रस्ता तसेच संपूर्ण शहरात ठिकठिकाणी पडलेल्या डेब्रीजवर प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर उचलण्याची कार्यवाही करावी. शहरात कुठेही डेब्रीजचे ढिगारे दिसणार नाही. शहरातील डेब्रीज उचलले गेले नाही तर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला. शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटविण्यासाठी जर कंत्राटदार दिरंगाई करत असेल तर तात्काळ कंत्राटदारावर कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.