लॉकडाऊनच्या काळात लोकवस्तींमधील गरजू कुटुंबांना समता विचार प्रसारक संस्थेकडून अन्नधान्याची मदत करण्यात आली. लॉकडाउनमुळे हातावर पोट असणा-या लोकांना अतिशय बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते आहे. अश्यावेळी ठाण्यातल्या ५१ लोकवस्तींमधील १ हजार १९१ कष्टकरी गरजू कुटुंबीयांना समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ५ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, ५ किलो आटा, १ किलो तेल, साबण, हळद, मीठ आदी जीवनावश्यक वस्तू आणि धान्यपुरवठा करण्यात आला. ही मदत संस्थेतील गेल्या अनेक वर्षातील गरजू एकलव्य विद्यार्थी, नाका कामगार, कंत्राटी आणि स्थलांतरीत मजूर, घरेलू कामगार, कचरा वेचक, रिक्षा चालक आदी हातावर पोट असणा-या लोकांना करण्यात आली आहे.
शासकीय मदत काही गरजूंपर्यंत पोहचत नसून अश्या बिकट स्थितीत, मदतीचे हे काम निरंतर सुरु ठेवणे सर्वांचेच कर्तव्य असल्याचं संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया म्हणाले. त्यामुळे सहयोगी संस्था आणि दानशूर देणगीदार यांच्या सहाय्याने हे काम यापुढेही सुरू ठेवण्याचा संस्थेचा निर्धार आहे. संस्थेतर्फे कोरोना लॉकडाऊन अन्नपूर्णा प्रकल्प कँप यशस्वी करण्यासाठी अमित मंडलिक, मंगेश गुप्ता, घनश्याम मिश्रा, प्रवीण खैरालिया, सुजित भाल, सुनील दिवेकर, रवी नायडू, दिपाली सावंत-पाटील, राहूल सोनार, स्नेहल राठोड, वैष्णवी कारंडे, सीमा श्रीवास्तव, शोभा वैराळ या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले अशी माहीती संस्थेच्या लतिका सु. मो. यांनी दिली. स्थलांतरित मजुरांना सन्मानाने त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याच्या दृष्टीने मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नातही संस्था सक्रिय सहभागी आहे. ज्या गरजूंना मदत हवी असेल त्यांनी ९८६९९८४८०३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेनं केले आहे.