शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा ठाणे जिल्ह्यातील शासकीय कामांवर परिणाम होणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास अडथळा आणणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या अनुषंगाने आरोग्य सुविधा आणि अत्यावश्यक सुविधावर झालेला परिणाम यासंदर्भात शंभूराज देसाई यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. शासकीय कर्मचाऱ्याच्या संप कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालय येथे बाह्ययंत्रणेव्दारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवण्यात यावी. रुग्णालयातील बाहय रुग्णच्या तपासणीवर परिणाम होणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घ्यावी. एनआरएचएचे कर्मचारी संपात सहभागी असल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्याच्या जागी बाहय यंत्रणेव्दारे कर्मचारी नियुक्ती करण्यात यावेत. तसेच जे कर्मचारी संपात सहभागी नाहीत आणि कार्यालयात रुग्णालयात उपस्थित असतात परंतु कर्मचारी संघटनातील कर्मचारी त्यांना कामावर येण्यास अडथळा निर्माण करत असतील, तर अशा अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुध्द संबंधित विभागप्रमुखानी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा रुग्णालये सुरळीत सुरु राहण्यासाठी फिरते दौरे करावेत. अश्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.