श्रीमलंग गडावर जाणारा मुख्य रस्ता धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं माघी पौर्णिमेच्या निमित्तानं येणा-या श्रध्दाळू भाविकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. येत्या ८ फेब्रुवारीला माघी पौर्णिमा असून माघी पौर्णिमेला हजारो भक्त, शिवसैनिक याच मार्गानं मलंगगडावर येतात. या रस्त्यासाठी वापरलेलं लोखंड गंजलेल्या स्थितीत असून त्याचे पापुद्रेही निघत आहेत. नुकत्याच रूंदीकरण करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाचीही चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या रस्त्याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास रस्ता खोल दरीमध्ये कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. डोंगराळ भागात हा गड असल्यानं आणि रस्ताही नागमोडी असल्यानं भक्तांना या गडावर जाणं कठीण होत आहे. गडावरच्या पाय-याही फुटल्या आहेत.