नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या दोन दिवसांतच ३ हजार ९३७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. केवळ ठाणेच नव्हे तर अगदी कल्याणपासूनच्या रक्तदात्यांनी ठाण्यात येऊन रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी नवरात्रीचे औचित्य साधून ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीच्या माध्यमातून केला. कुठलीही गौरवशाली परंपरा सुरू करणे आणि ती त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्याच्या नवरात्रौत्सवाची गौरवशाली परंपरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवली आहे. या महारक्तदान सप्ताहाच्या निमित्ताने या नवरात्रौत्सवाला नवे परिमाण लाभले असून ही खरी भक्ती आहे, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी शुभारंभ करताना काढले. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते एकाच्या शरीरातून काढूनच दुसऱ्याला द्यावे लागते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील सुमारे ६५ ब्लड बँका या महारक्तदान सप्ताहात सहभागी झाल्या आहेत. काल २३३७ बाटल्या, तर आज १६०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.