राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून अभ्यास केला जात असून शिक्षकांना सरकारकडून न्याय दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका मांडून युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येतील ही काळ्या दगडावरील रेघ आहे असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातील भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. राज्यात २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाईं युतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, दुर्देवाने त्यावेळी आपले सरकार स्थापन झाले नव्हते. परंतु, आता सहा महिन्यांपूर्वी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जनहितार्थ निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांबरोबरच शिक्षक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाणे-पालघर जिल्ह्यासह एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोसह विकासाची कामे सुरू आहेत. भविष्यात रस्त्यावरुन लाखो गाड्या कमी होतील, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष आहे. वार्षिक परीक्षेच्या काळातील विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा पे चर्चा हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असे आवर्जून मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या २०१६ मधील निवडणुकीत शिवसेना, शिक्षक परिषद आणि शिक्षण क्रांती संघटनेची एकत्रित मते १५ हजारांहून अधिक होती. आता आपण सर्व एकत्र आलो आहोत. गेल्या सहा वर्षांत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा औपचारिक असून, ती काळ्या दगडावरील रेघ आहे. परंतु, कोणीही गाफील राहू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
विधानसभेत युतीला बहुमत आहे. पण विधान परिषदेत बहुमतासाठी पाच जागांवर होणाऱ्या निवडणुका महत्वाच्या आहेत. या सर्व जागांवर विजय मिळविण्याची संधी आहे. त्यादृष्टीकोनातून युतीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.