लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, लोकशाहीच्या प्रवाहात राहून शासनाला सुईसारखे टोचत राहिले पाहिजे, मग ते कोणाचेही सरकार असूदे. निर्भयाच्या घटनेनंतर कायद्यात महत्वपूर्ण बदल झाले हे फक्त जनरेट्यामुळेच शक्य झाल्याचं शौर्यचक्र प्राप्त मेजर मनिष सिंग यांनी सांगितलं. आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत होते. कोणत्याही समस्या, प्रश्न असले तर शासन आणि प्रशासनाकडे बोट दाखवले जाते. तुमच्या आजूबाजूला दिसणा-या समस्या, प्रश्नांबाबत तुम्ही शासन आणि प्रशासनाला जाब विचारा. जनरेट्यानं ते प्रश्न सोडवणं त्यांना भाग आहे असा सल्लाही मेजर मनिष सिंग यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी प्रसिध्द लेखिका शिल्पा खेर यांनी मेजर मनिष सिंग यांच्या कर्तृत्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. लष्कराच्या शौर्याचे चित्रपट बनतात मात्र चित्रपट आणि वास्तव यात फरक आहे. सर्जिकल स्ट्राईक इतके सोपे नसते, भारतीय सैन्याला आजपर्यंत कोठेही अपयश आलेले नाही. त्यामुळं चित्रपट कमी बघा आणि वाचनावर भर देण्याचा सल्ला मेजर मनिष सिंग यांनी दिला. विद्यार्थ्यांनीही आपलं वैयक्तिक कर्तव्य काय आहे हे ओळखलं पाहिजे. जबाबदारीनं वागणं आणि स्वत: योगदान देणं ही खरी देशभक्ती असल्याचं मेजर मनिष सिंग यांनी यावेळी सांगितलं.