पनवेल महानगरपालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेनंही कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावावी अशी मागणी एक जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाण्यातील हरिनिवास परिसरात कबुतरखान्याची निर्मिती झाली आहे. या कबुतरखान्यामुळे रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापला गेला आहे. हरिनिवास भाग हा वर्दळीचा भाग असून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. या परिसरातून जाणा-या वाहनांना आणि पादचा-यांना कबुतरखान्यातून वाट काढत जावं लागतं. काही वेळा कबुतरं अचानकपणे दुचाकीस्वारास धडकतात. अशा अपघातात मागून येणारे मोठे वाहन दुचाकीस्वारास चिरडू शकते. काही विशिष्ट समाजाच्या भूतदयेपोटी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तसंच कबुतराच्या विष्ठेतून येणा-या जाणा-या नागरिकांना हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनियासारख्या भयानक आजारास सामोरं जावं लागत आहे. यासाठी पनवेल महापालिकेप्रमाणे कबुतरांना खाद्यपदार्थ देऊ नयेत अशा सूचना जागोजागी लावण्याची मागणी महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.