शहरातील शिवसेनाच्या जुन्या शाखा ताब्यात घेणाऱ्या मिंधे गटाला योग्य समज द्यावी तसेच समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी याची दक्षता घ्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्रामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ५६ वर्षामध्ये अनेक शिवसेना शाखा आणि कार्यालये सुरु आहेत. त्यापैकी ठाण्यामध्येहि गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या विविध भागामध्ये शिवसेनेच्या शाखा कार्यान्वयित आहेत. त्यापैकी काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ता धारकांकडे असून या मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. असे असताना सुद्धा मिंधे गटाकडून सातत्याने जोर जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून शाखा बळकावण्यात आलेल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या जुन्या शाखा बळकावण्याचे षडयंत्र गुंडांमार्फत रचले जात आहेत. समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मिंधे गटाला पोलीस यंत्रणेने प्रोत्साहन न देता योग्य समज द्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी मिंधे गटाची तसेचं पोलीस खात्याची राहील असे पत्रामध्ये म्हंटले आहे.