रस्त्यावर फिरणाऱ्या आणि वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून महिला आणि बालविकास विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पथकाच्या राज्यातील पहिल्या बालस्नेही बसचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी देऊन 50 लाखांचा निधीही दिला. हा प्रकल्प राज्यातील ठाणे जिल्ह्यासह पुणे, नाशिक, मुंबई शहर आणि उपनगर तसेच नागपूर या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या पथकासाठी बालस्नेही बस देण्यात येणार असून राज्यातील या पहिल्या बसचे उद्घाटन ठाण्यात झाले. एका बसमध्ये 25 मुलांची सोय, जिल्ह्यातील सहा ठिकाणी बस फिरणार, बसमध्ये एक समुपदेशक, शिक्षक-शिक्षिका, वाहनचालक आणि काळजी वाहक असे चार कर्मचारी, बसमध्ये सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टीम अशा सुविधा आहेत.