शहरातील खड्डे तात्काळ दुरूस्त करावेत अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं जाळं दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हाच प्रकार पहायला मिळतो. खड्ड्यांबाबत ओरड झाली की लाखो-करोडो रूपये खर्च करून खड्डे बुजवले जातात. मात्र पुन्हा दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडलेले असतात. गेल्या चार ते पाच महिन्यात कोरोनामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहनांची वर्दळही कमी होती. मात्र असं असतानाही महत्वाच्या चौक आणि रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य दिसत आहे. रस्त्यांवरील हे खड्डे तात्काळ दूर करावेत अन्यथा अनोख्या पध्दतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे.