शवागारातील वातानुकुलित यंत्रणा बंद पडल्यानं २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

जिल्हा शासकीय रूग्णालयातील शवागारामध्ये असलेल्या वातानुकुलित यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ठाणे आणि पालघर पोलीसांनी २२ मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा शासकीय रूग्णालयातील शवागारामध्ये २२ बेवारस मृतदेह होते. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आढळून आलेले बेवारस मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयातील शवागारामध्ये ठेवले जातात. त्याचप्रमाणे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बेवारस व्यक्तींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केलं जातं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत त्यांचे मृतदेह शवागारात ठेवले जातात. गेल्या ६ महिन्यापासून २२ मृतदेह शवागारात होते. या शवागाराची क्षमता १२ मृतदेह ठेवण्याची आहे. त्यामुळं जवळपास दुप्पट मृतदेह शवागारात होते. या शवागारामुळे आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्रास होतो. वातानुकुलित यंत्रणा बंद झाल्यावर मोठी दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरात पसरत असते. त्यामुळं हे शवागार इतरत्र हलवावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. रूग्णालय प्रशासनानं वातानुकुलित यंत्रणा बंद पडल्याची बाब पोलीसांना कळवली होती. पोलीसांनी २२ मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading