कोवीड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत मुरबाड तालुक्यातील नारिवली ग्रामपंचायतीचा आज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची समितीच्या बैठकीत आज हा सत्कार समारंभ झाला. नारिवली गावाच्या सरपंच देवयानी भोईर, उपसरपंच कल्पेश सोरसे, ग्रामसेवक निलेश गोरले, सदस्य योगेश भोईर यांनी हा सत्कार स्विकारला. नारिवली ग्रामपंचायतीने गावातील सर्व नागरिकांना 100 टक्के पहिला डोस तर 98 टक्के दुसरा डोस दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. यापुढेही जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती लसीकरण मोहिमेत चांगले काम करतील, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.