शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्यावतीने ६ ते १० वर्षे आणि ११ ते १४ वर्षे या दोन वयोगटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत खारेगाव तलाव, उपवन तलाव, कचराळी तलाव आणि आंबेघोसाळे तलाव या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्रकला स्पर्धेसाठी प्रदूषण मुक्त शहर, माझी वसुंधरा माझी जबाबदारी, प्लास्टिक बंदी असे विषय देण्यात आले होते. कोव्हिड-१९ च्या नियमांचे पालन करुन पार पडलेल्या या सर्व चित्रकला स्पर्धेला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेदरम्यान उपस्थितांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. या स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांना प्रत्येक गटातून एकूण ५ बक्षिसे देण्यात येणार असून त्यांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात येणार आहे.