ठाण्यातील एल.बी.एस. मार्गावरील खोपट जंक्शन येथे उभारलेले एक भलेमोठे व्यावसायिक होर्डिंग सहजपणे दिसावे या उद्देशाने, होर्डिंगच्या आड येणाऱ्या एका भल्यामोठ्या पिंपळवृक्षाची निर्दयीपणे कत्तल करण्याचा प्रकार घडला आहे. पूर्वाश्रमीचा आग्रा रोड म्हणून ओळखला जाणारा हा हमरस्ता, मुळातच वनखात्याच्या जागेतून जात होता. नंतरच्या काळात त्याचे लाल बहादूर शास्त्री मार्ग असे नामकरण झाले. वनखात्याने हस्तांतरित केलेल्या या मुख्य रस्त्याच्या स्मृती जपण्यासाठी तरी, संबंधित पिंपळवृक्षाचे संरक्षण करणे गरजेचे होते. पण पिंपळाचे झाड हे, जवळपास ३०० फूट परिघात प्राणवायूचा पुरवठा तर करीत होतेच, त्याचबरोबर तेवढ्याच परिसरातील तापमान सुमारे ५ अंशाने कमी राखत होते. परंतु, जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांसाठी, निर्घृणपणे या पिंपळवृक्षाची हत्या करण्यात आली आहे. कॅप्टन बाबा चव्हाण यांनी, न्यायालयात सात जनहित याचिका दाखल करुन, ठाणेकर नागरिकांसाठी प्राणपणाने जपलेला ब्रह्माळा तलाव याच ठिकाणी आहे. असे असतानाही, एका महाकाय वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल कशी होते? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाही करावी आणि ठेकेदाराचे कंत्राट कायमचे रद्द करावे अशी मागणी धर्मराज्य पक्षाने केली आहे.