महावितरण कर्मचा-यांना फ्रन्ट लाईन वर्कर घोषीत करावे, त्यांना ५० लाखांचे अनुदान द्यावे, लसीकरण करण्यात यावे, टीपीए स्कीम पुन्हा सुरु करावी, बील वसुलीची सक्ती त्यांच्यावर करु नये अशा विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या या मागण्या मान्य न झाल्यास कॉंग्रेस वेळ पडल्यास ८० हजार कामगारांसाठी आंदोलन उभे करु आणि यापुढेही जाऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वेळ पडल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची देखील आमची तयारी असल्याचे मत ठाणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. महावितरणचे कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज शहर कॉंग्रेसच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. वीज वितरणचे कर्मचारी हे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून काम करीत आहेत. त्यांना हा दर्जा मिळावा यासाठी महावितरणच्या विविध संघटना प्रयत्न करीत आहेत. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. आता ठाणे शहर कॉंग्रेसने या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या लढय़ात रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. वीज कामगार अभियंते आणि अधिकारी तसेच कंत्रटी कामगार यांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्यावा, तसेच त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, कोवीडमुळे मृत्यु झालेल्या वीज वितरण कर्मचा-यांना ५० लाखांचे अनुदान द्यावे, तीनही कंपन्यासाठी एम.डी.इंडिया या जुन्याच टीपीए कंपनीची पुन्हा नेमणुक करावी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वीज वितरण कर्मचाऱ्यांना वीज वसुलीची सक्ती करु नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. महावितरणच्या या ८० हजार कामगारांना कॉंग्रेसचा पाठींबा असून त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी महाविकास आघाडीवर दबाव आणू वेळ प्रंसगी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करुन यावर तोडगा काढू. तर यापुढेही जाऊन या कामगारांसाठी वेळ पडल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठीही आम्ही मागणी करू असं विक्रांत चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं.