वीज अधिकारी-अभियंता कर्मचारी संघर्ष कृती समितीतर्फे आज आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. अदानीनं भांडूप परिमंडळात शिरकाव करण्याची तयारी केली आहे. यामुळे वीज मंडळाचं मोठं नुकसान होणार आहे. याबाबत विधी मंडळावर मोर्चा नेण्यात आला होता. पण तरीही काहीही हालचाल होत नसल्यामुळे आता कृती समिती रस्त्यावर उतरली आहे. आजच्या मोर्चाची जिल्हाधिका-यांना कल्पना देण्यात आली होती. पण शासनाच्या दबावाखाली ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विविध परिमंडळातील कृती समितीच्या सदस्यांनी वागळे इस्टेट कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. हा मोर्चा कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी नसून ग्राहकांसाठी असल्याचं कृती समितीच्या निलेश्वर बनसोडे यांनी सांगितलं. याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास ४ तारखेला ७२ तासांच्या संपाचा इशारा देण्यात आला आहे. त्याउपरही काही निर्णय न झाल्यास वीज मंडळाचे कर्मचारी १८ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहे. भांडूप परिमंडळाला अडीच हजार कोटींचं दरमहा उत्पन्न आहे. या उत्पन्नावर परिणाम झाल्यास शेतक-यांना दिली जाणारी क्रॉप सबसिडीही बंद होण्याची भीती आहे. ही लढाई २ कोटीहून अधिक ग्राहकांसाठी असून ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहनही बनसोडे यांनी केलं आहे.