विद्यार्थी दशेतच मुलांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी, त्यांना साहित्याचे महत्व कळावे या उद्देशाने येत्या शनिवारी ७ जानेवारी रोजी कळवा येथील ज्ञानप्रसारणी शाळेत बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात होणारे अश्या प्रकारचे हे पहिलेच संमेलन असून यावेळी विद्यार्थी स्वरचित काव्याचे अभिवाचन करणार आहेत. शालेय जीवनात साहित्याची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, वाचन लेखनात त्यांची प्रगती व्हावी, यातूनच उद्याचे कवी, लेखक निर्माण होण्यास हातभार लागावा या संकल्पनेतून कळवा येथील ज्ञानप्रसारणी संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना कविता वाचन आणि अभिवाचनाचे धडे देण्यात आले. या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांची भाषाविषयक गोडी वाढली असून, जवळपास ६०हुन अधिक विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता आणि लेख लिहिले असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. विद्यार्थ्यांचा हा उत्साह आणि विषयातील आवड पाहून, ज्ञानप्रसारणी शाळेने शनिवारी एक दिवसीय बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात तुतारी, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी यांच्या सहभागातून साहित्य दिंडी निघणार आहे. त्यांनतर विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेले काव्य वाचन असे या संमेलनाचे स्वरूप असणार आहे.