विस्थापित, बेरोजगार नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी सहभाग घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आली असून यामध्ये उद्योगधंदे प्रभावीत झाल्यामुळे अनेक कामगार विस्थापित, बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये परराज्यातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा नागरिकांची निवारा, गृह, पाणी, अन्नधान्य, भोजन आणि वैद्यकीय देखभाल व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदतकेंद्र सुरू करण्याची कार्यवाही समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून निवास केंद्राची निर्मिती करण्यात यावी असे आदेश शासनाच्या माध्यमातून देण्यात आले असून सामाजिक संस्थांचे देखील सहकार्य घ्यावे या अनुषंगाने सर्व प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांना आदेश देवून नागरिकांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात यावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या उपक्रमात सक्रिय सहभाग घेवू इचिछणाऱ्या सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी samajvikasmis@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.