महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कमळाचं बटन दाबलं तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि अनुच्छेद ३७० ला विरोध करणा-यांवरही पडेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ठाण्यात बोलताना केलं. ठाण्यामध्ये ते उत्तर भारतीय संघटनेच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पाकिस्तान सातत्यानं अणुबॉम्बच्या धमक्या देत आहे. त्याला चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचं बटन दाबलं तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात पडेल असं वक्तव्य करत त्यांनी भारतीय जनता पक्षालाच मतदान करण्याचं आवाहन केलं. भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान झालं तर काँग्रेस पुन्हा मतदान यंत्रालाच दोष देईल असं सांगून लक्ष्मी ही कमळातून येते घड्याळातून नाही. घड्याळ बंद पडलं असून आता महाराष्ट्र आणि देशातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हद्दपार करायचं आहे यासाठी सर्वांनी साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.