विधानसभा निवडणुकांदरम्यान भडकावू भाषणांवर अंकुश असावा अशी मागणी जिल्ह्यातील छटपूजा संस्थेच्या सुखचंद पाठक यांनी केली आहे. २१ ऑक्टोबरला निवडणूक होत असून या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी येणारे काही उत्तर भारतीय नेते भडकावू भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळं छटपूजा आणि छोट्या धंदेवाल्यांना याचा त्रास होतो. हे लोकं भाषण करून निघून जातात पण स्थानिक उत्तर भारतीय समाज आणि मराठी माणसामध्ये तेढ निर्माण होते. मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी विवादास्पद उत्तर भारतीय नेते कन्हैय्याकुमार आले होते. अशा मंडळींच्या भाषणावर अंकुश असावा अथवा भाषणावर काही बंधनं घालून दोन समाजात शांतता प्रस्थापित करून विधानसभा निवडणूक शांततेनं पार पाडावी अशी विनंती सुखचंद पाठक यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.