विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाताना कोणताही न्यूनगंड बाळगू नये. पक्षकार हे वकीलांच्या मेहनतीला, अभ्यासाला आणि प्रामाणिकते कडे बघून काम देतात त्यामुळे मनात कोणतीही भीती ठेवण्याचं कारण नाही असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयात विधी शिक्षण आणि या क्षेत्रातील संधी या विषयावरील व्याख्यानात बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले. यावेळी अभय ओक यांनी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करावा, कोणती पुस्तकं वाचावीत तसंच पदवी प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या संधी मिळू शकतात यावर मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या वकील आणि न्यायाधीशांचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. वकीलांनी या व्यवसायात आल्यानंतर धैर्य ठेवावे, मेहनत करावी आणि ज्या दिवशी संधी मिळेल त्याचे सोने करावे असे सांगितले. विद्यार्थ्यांनीही यावेळी विचारलेल्या प्रश्नांना अभय ओक यांनी समर्पक उत्तरं दिली. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीविद्या जयकुमार यांनी महाविद्यालयाचा ५० वर्षांचा इतिहास विषद केला. या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकर, मुंबई आणि ठाणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील वर्ग, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.