विटावा पूलाची दुरूस्ती हाती घेतली जाणार असल्यामुळं पुढील सहा दिवस या रस्त्यावरील वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. विटावा रेल्वे पूलाखाली पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचून रस्त्याला खड्डे पडतात. यामुळं रस्ता खराब होतो आणि त्यामुळं मोठी वाहतूक कोंडीही होते. आता या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण केलं जाणार असून यासाठी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. नवी मुंबईकडून येणा-या अवजड वाहनांना पटनी कंपनीकडून बेलापूर रोडला मिळणा-या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहनं ऐरोली मार्गे इच्छीत स्थळी जाऊ शकतील. हलक्या वाहनांना मात्र या रस्त्याचा वापर करता येणार असून दुरूस्तीच्या वेळी एक बाजू खुली ठेवली जाणार असून त्यावर नवी मुंबईकडून येणा-या वाहनांना एकदा तर ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणा-या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळं या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.