जान्हवी काटेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने महाराष्ट्र यंग क्लबचा नऊ विकेट्सनी दणदणीत पराभव करत विजय क्रिकेट क्लबने अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय साकारत बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेतील सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना ९१ धावांवर रोखल्यावर जान्हवीच्या तुफानी फलंदाजीमुळे विजय क्रिकेट क्लबने १० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ९७ धावा करत यशावर शिक्कामोर्तब केले.
संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या जान्हवीने १० धावांत ३ विकेट्स मिळवत महाराष्ट्र यंग क्लबला ९१ धावांवर रोखले. त्यांच्या पविथ्रा अय्यंगारने २९ आणि गार्गी वारंगने १४ धावा केल्या. जान्हवीला साथ देताना बतूल परेरा आणि हिमजा पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. डावाची दणकेबाज सुरुवात करताना जान्हवीने २२ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकार ठोकत नाबाद ४३ धावा करत संघाला विजयचा दरवाजा उघडून दिला. रिया चौधरीने ३८ धावांची खेळी करताना पाच चौकार आणि एक षटकार मारला. जान्हवीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र यंग क्लब : २० षटकात ९ बाद ९१ ( पविथ्रा अय्यंगार २९, गार्गी वारंग १४, जान्हवी काटे ४-१०-३, बतुल परेरा ४-१-१६-२, हिमजा पाटील ४-२१-२) पराभूत विरुद्ध विजय क्रिकेट क्लब : ९.४ षटकात १ बाद ९७ ( जान्हवी काटे नाबाद ४३, रिया चौधरी ३८, आर्ची यादव ०.४-३-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – जान्हवी काटे